सिद्दी हे ॲबिसिनियातून गुलाम बनवून भारतामध्ये आणले होतेः हे लोक दक्षिणेमध्ये बहामनी साम्राज्य व नंतर आदिलशाही व निजामशाहीमध्ये सामील झाले. निजामशाहीमधील मलिक अंबर याचे व मालोजीराजे, विठोजीराजे, शहाजीराजे, शरीफजीराजे यांचे संबंध हे मित्रत्वाचे होते. भातवडीच्या युद्धात भोसले बंधूंच्या कामगिरीमुळेच मलिक अंबरला मोठा विजय प्राप्त झाला होता. आदिलशाहीतील रणदौलाखान हा सिद्दी असून, तो शहाजी महाराजांचा मित्र होता. संकटाच्या काळात शहाजी महाराजांना रणदौलाखानाने मदत केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी जंजिऱ्याच्या सिद्दीच्या विरोधात अनेक मोहिमा आखल्या. असे असले, तरी सिद्दी हिलाल, सिद्दी इब्राहीम, सिद्दी मिस्त्री, सिद्दी वाहवाह स्वराज्यामध्ये होते. दख्खनच्या इतिहासामध्ये सिद्दी व मराठा यांचे सोळाव्या व सतराव्या शतकात एक वेगळेच महत्त्व होते. या पुस्तकात या सर्व पैलूंची साधार, विस्तृत व चिकित्सक मांडणी केली आहे.