वयाच्या विशीत असलेल्या तुकारामांना भांबनाथाच्या डोंगरावर साक्षात्कार झाला, हे खरे आहे. पण हा साक्षात्कार आध्यात्मिक स्वरूपाचा नव्हता, तर सामाजिक न्यायाच्या स्वरूपाचा होता. या साक्षात्कारानंतर त्यांनी पहिले पाऊल उचलले, ते वडिलांनी लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणीच्या डोहात बुडवण्याचे होय. त्यांनी हे कृत्य संसाराला विटल्यामुळे नव्हे, तर संसाराला चिकटणारा शोषणाचा घटक छाटून टाकण्यासाठी केले. अन्नान्न दशा झाल्यामुळे ते ईश्वरभक्तीकडे वळले, हे काही लेखकांचे म्हणणेही खरे नव्हे. कारण, मी जनार्दनाकडे आलो, ते काही अन्नाला महाग झालो होतो म्हणून नव्हे, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. मी वेदांचा अंकित नाही, भेदभाव सांगणारा वेदांचा भाग गाळून उरलेला भाग मी प्रमाण मानतो, सर्वांच्या ठिकाणी समत्व पाहणे हे ब्रह्माचे स्वरूप न जाणणारा पंडित दुराचारी होय, अशी भूमिका त्यांनी घेतली. सर्वांचे चर्म व मांस समान असताना भेदभाव कशाच्या आधारे करायचा, वाण्याच्या दुकानातून गूळ घ्यायचा असेल तर त्याची जात व कूळ कशाला विचारायचे, गावाचा मोकाशी हलक्या जातीतील असला तर त्या कारणाने त्याची आज्ञा मानायची नाही काय, असे प्रश्न त्यांनी विचारले. महार व्यक्तीला स्पर्श झाल्यामुळे ज्याला राग येतो तो काही खरा ब्रह्मज्ञानी ब्राह्मण नव्हे, त्याने देहान्त प्रायश्चित्त घेतले तरी त्याचे पाप फिटत नाही, असे त्यांनी म्हटले.