आपल्या शब्दसामर्थ्याने 'अणूला छेदून त्यात सात समुद्रांना समाविष्ट करणारे' महाकवी म्हणजे तिरुवल्लुवर ! कवी, तत्त्वज्ञ, संत तिरुवल्लुवर यांनी जवळपास २००० वर्षांपूर्वी 'तिरुक्कुरल' हा ग्रंथ रचला. तमिळ साहित्याचा सुवर्णकाळ समजल्या जाणाऱ्या संगमयुगात हा ग्रंथ रचलेला असून, नीती व सदाचाराचे मार्गदर्शन करणारा तो एक दीपस्तंभ आहे. तीन भागांत विभागलेला १३३० दोह्यांचा हा अद्वितीय ग्रंथ नीती, अर्थ व प्रेम या तीन मूल्यस्तंभांवर उभा आहे. विचार आणि व्यवहार यांचा संगम साधत 'जीवनाचे शाश्वत तत्त्वज्ञान' सांगणारा हा ग्रंथ आधुनिक काळातही तितकाच समर्पक असा अनमोल ठेवा आहे. स्थळ, काळ, भाषा आणि धर्म यांच्या सीमा ओलांडून अवघ्या मानवजातीला प्रकाश देणाऱ्या विचारकिरणांनी सजलेला हा ग्रंथ भारतीय साहित्याने जगाला दिलेली एक अजरामर देणगी आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. प्रस्तुत पुस्तकात तिरुक्कुरलच्या पहिल्या भागातील ५० निवडक, विचार व वर्तन प्रवर्तक दोह्यांचे चिंतन मांडलेले आहे. या पुस्तकात घेतलेले तिरुवल्लुवरांचे निवडक विचार वाचकाला अंतर्मुख करतात आणि त्याच वेळी जगण्याची नवी दृष्टीही देतात.