ऊन्ह सोसण्याची, ते पेलण्याची, ते पचवण्याची, त्याचं स्वागत करण्याची, त्याच्या स्पर्शानं मोहरण्याची शक्ती आपल्या मुलामुलींच्या व्यक्तिमत्त्वात यायला हवी. याचा अर्थ असा नव्हे, की त्यांना सतत उन्हातच उभं करावं. अधून-मधून थंडगार सावलीचा अनुभव हवाच. सावली काही नेहमीच दुष्टावा करीत नाही. कधी कधी ऊन्ह असह्य होतं, ते सोसण्याच्या सगळ्या मर्यादा संपतात, तेव्हा अंगावर थंडगार सावली हवीहवीशी वाटतेच. ती दिलासा देते, करपून जाण्यापासून वाचवते, जळून खाक होण्याच्या सीमेवरून माघारी आणते, जगण्याची ऊर्मी प्रबळ करते. आणि सावलीचं असं माहात्म्य असूनही, आपल्या मुलामुलींनी तिचा पदर सोडून बाजूला जायचंच नाही, इतकं मात्र तिच्या मोहात पडू नये. त्यांनी योग्य वेळी तिच्यापासून अलग व्हावं. उन्हात जावं, ऊन्ह प्यावं, ऊन्ह पचवावं आणि लख्ख सूर्यप्रकाशात वाढावं, मोहरून-बहरून यावं !