महात्मा फुले हे आधुनिक भारताच्या विचारप्रवाहाचे खरे संस्थापक होते. भारतातील सर्व न्यायाच्या चळवळींचा जन्म हा फुलेवादातून झाला आहे. भारतातच नव्हे तर जगात वंचितांचा (Subaltern) इतिहास लेखन परंपरेचे खरे संस्थापक हे महात्मा फुले हेच आहेत. डॉ. फकिरा राजगुरू यांनी महात्मा फुलेंच्या इतिहास लेखन पद्धतीची चिकित्सा करून ती वैधानिक व वैज्ञानिक इतिहास लेखन पद्धती असल्याचे दाखवून दिले आहे. या पुस्तकातून इतिहासकार महात्मा फुले यांच्या अज्ञात पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. फुलेंचे वस्तुनिष्ठ इतिहासलेखन केवळ कागदी इतिहास नव्हता तर भारताच्या इतिहासातील आमूलाग्र परिवर्तन घडविण्याचे ते माध्यम ठरले होते. न्याय निर्माण करणारे व ते सामान्यांना देणारे हे लिखाण जगाच्या इतिहासातच नव्हे तर भारताच्या दृष्टीने वंचितांचा समग्र उद्धार करणारे ठरले. यातूनच भारतातील सर्व न्यायाच्या चळवळी जन्माला आल्या. नव्हे या साऱ्या चळवळींचे बाळंतपण महात्मा फुलेंनी केले.
फुलेवादी इतिहासलेखन मीमांसा करणारा हा ग्रंथ मौलिक असून तो मैलाचा दगड ठरेल.