आजच्या अवघड वाटणाऱ्या काळात फार धैर्यानं उभं राहण्याची गरज आहे. निराश होण्याची वा वैफल्यग्रस्त होण्याची, आता आपण सर्व काही गमावलं आहे, असं मानण्याची ही वेळ अजिबात नाही. सामाजिक जीवनात चढ- उतार येत असतात, लाटा येतात जातात, सत्ता येतात जातात. राजकीय सत्तांपेक्षा सांस्कृतिक सत्ता महत्त्वाच्या असतात, याकडं बहुजनांनी लक्ष देणं गरजेचं आहे. मला खंत वाटते ती अशी, की बहुजनांतले लोक राजकीय सत्तेच्या मागं धावणारे असले, तरी सांस्कृतिक सत्ताधाऱ्यांचे ते गुलामच राहिले आहेत; मग ते राजकीय सत्तेत असोत अथवा नसोत ! तुमच्या जीवनाची सगळी मूल्यं जर दुसराच कुणीतरी ठरवत असेल, तर तुमच्याकडं जळता जळत नाही इतकी इस्टेट, सत्ता-संपत्ती असून तिचे करायचं काय? तुम्ही मनानं गुलामच असाल, तर ती सत्ता संपत्ती- वैभव काय कामाचं ?