हे लेखन प्रा. दीक्षितांच्या आक्षेपांना उत्तर देण्याच्या निमित्ताने घडले असले, तरी ते तेवढ्यापुरतेच मर्यादित मात्र नाही. हे लेखन प्रा. दीक्षितांच्या आक्षेपांना उत्तरे देता देता भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील असंख्य घटनांचे विवेचन करणारे आहे. वाचकांनी प्रामुख्याने त्या दृष्टीनेच त्या लेखनाकडे पहावे, अशी माझी विनंती आहे. सर्वसामान्य माणसांचा एक प्रतिनिधी या नात्याने भारतीय संस्कृतीचा परंपरागत इतिहास वाचताना त्या इतिहासाच्या विकृत व अन्यायी स्वरूपामुळे माझ्या काळजावर पुनःपुन्हा घाव घातले गेले आणि त्या घावांच्या वेदनांनी डोळे उघडल्यामुळे मी या पुस्तकाला प्रस्तुत नाव दिले.
भारतीय संस्कृतीचा इतिहास घडत असताना वैदिकांनी येथील बहुजन समाजावर अपार अन्याय केलेच. पण तो इतिहास लिहितानाही प्रत्यक्ष घडलेल्या घटनांचे वस्तुनिष्ठ वर्णन करण्याऐवजी आपल्या लहरीनुसार व आपल्या हितसंबंधांसाठी आपल्या 'सख्ख्या' पूर्वजांना सर्व चांगल्या गोष्टींचे श्रेय द्यायचे आणि वाईट गोष्टींचा ठपका इतरांच्या माथी ठेवायचा अशी चलाखी केली. इतिहास लिहिताना न्यायाला अन्याय आणि अन्यायाला न्याय्य ठरवून टाकण्याची किमया त्यांनी केली. स्वतःच्या अत्यंत दुष्ट पूर्वजांनाही सज्जन म्हणून आणि बहुजनसमाजातील अत्यंत सत्प्रवृत्त व सदाचरणी लोकांनाही दुष्ट म्हणून रंगवण्याचे काम त्यांनी केले. खरेतर अशा प्रकारची 'पापे' त्यांनी किती केली, त्यांची गणतीच नाही. म्हणूनच त्यांनी सांगितलेल्या इतिहासाकडे संशयाने पाहणे, ही भारताचा इतिहास नीट समजून घेण्यासाठी असलेली अत्यंत महत्त्वाची अशी पूर्व-अट आहे, असे मी मानतो.