जागतिकीकरणासारख्या घटकांकडे तरुणांनी केवळ नकारात्मक दृष्टीने पाहू नये वा त्यांची उपेक्षा करू नये. या घटकांमुळे तरुणांसाठी जगात कोठेही जाऊन कर्तृत्व गाजविण्याच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. त्या संधींचा लाभ घेण्यासाठी तरुणांनी सज्ज झाले पाहिजे. कष्टाला पर्याय नाही, हे ओळखले पाहिजे. वेगाने येणारे नवे संशोधन आत्मसात केले पाहिजे. विविध प्रकारची कौशल्ये प्राप्त केली पाहिजेत. जगाच्या पाठीवर कोठेही जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. या मार्गाने त्यांना अत्युच्च यश प्राप्त करता येईल, परंतु बेभान होऊन केवळ यशाच्या पाठीमागे धावण्याच्या नादात त्यांनी गैरवाजवी ताणतणाव मात्र ओढवून घेऊ नयेत. त्यासाठी त्यांनी आपल्यावर मानवी मूल्यांचे संस्कार करून घेतले पाहिजेत. अशा संस्कारांमुळेच अपयश कसे पचवावे, एवढेच नव्हे, तर यश कसे पचवावे, याचे भान प्राप्त होते. सावधगिरी बाळगली असता, तरुणांना यशाबरोबरच उच्च कोटीचा आनंद मिळवता येईल, तसेच स्वतः मिळवलेला आनंद इतरांनाही वाटता येईल.