सत्याने वर्तावे ज्यास लोभ झाला, मानवी शोभला तोच सुखी. सर्वसुखी व्हावे, मूळ आशा ज्याची, हाव सद्गुणाची तोच ज्ञानी. आप सुख दुःख परांचे जाणतो, त्यांच्याशी वर्ततो तोच धन्य अशा मानवास सद्गुणी म्हणावा, भावंडी गणावा जोती म्हणे.
बंधु-भगिनींनो, महात्मा फुल्यांचा हा अखंड ज्यांना तंतोतंत लागू पडत आहे, ज्यांनी बहुजन समाजाला समाज क्रांतिकारी विचारांचा वारसा दिला, खऱ्या अर्थाने 'प्रबोधनकारांचे प्रबोधनकार' असे म्हणून भावी पिढ्या वर्षानुवर्षे ज्यांचं गुणगान करतील, विद्रोहाची प्रेरणा घेतील आणि आदर्श समाज निर्माण करण्यासाठी, अविरतपणे धडपडतील, याची हमी ज्यांच्या विचारांमधून मिळते, ते महाराष्ट्रातील थोर विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे. - उर्फ तात्या.
मी माझ्या एकपात्री प्रयोगामधून तात्यांच्या रोमांचकारी जीवनकार्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे.