शिवराय विलक्षण बुद्धिमान होते, हे परमानंदाने वेगवेगळ्या प्रकारे स्पष्ट केले आहे. ते अफजलखानाला भेटण्यासाठी गेले, तेव्हा त्यांचे वर्णन करण्यासाठी परमानंदाने वापरलेला' अनल्पधीः' हा शब्द माझ्या काळजाला स्पर्श करुन गेला आहे आणि मस्तकामध्ये कोरला गेला आहे. शिवराय अफजलखानाशी केवळ हातांनी, केवळ शरीराने वा केवळ शस्त्रांनी लढले, असे नाही. ते त्याच्याशी बुद्धीने लढले. बुद्धी हेच शरीराच्या आणि शस्त्रांच्या लढाईचे अधिष्ठान होते. किंबहुना, त्यांचा आयुष्यभरचा संघर्ष हा मूलतः बौद्धिक संघर्षच होता. तो शरीराच्या व शस्त्रांच्या माध्यमातून व्यक्त होत होता, इतकेच. बुद्धीच सर्व कर्तृत्वाचे ऊर्जाकेंद्र असते. तीच सर्व पराक्रमांची जननी असते. जीभ, हात, किंबहुना एकूण शरीर आणि विविध शस्त्रे यांना आदेश, दिशा, नियंत्रण, अचूकता व विवेक देण्याचे काम बुद्धीच करते आणि शिवरायांकडे तर ती 'अनल्प' होती ! आज आम्हांला त्यांच्याकडून इतर गोष्टींबरोबरच या अनल्प बुद्धीचा वारसा घेण्याची, बुद्धीने लढण्याची, त्यांचे तंत्र आत्मसात करण्याची गरज आहे !