डॉ. प्रशांत गायकवाड यांनी बाबासाहेबांचा बुद्धांविषयीचा दृष्टिकोण सोप्या भाषेत लोकांना समजावून देण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे. त्यांनी त्यासाठी बाबासाहेबांच्या "THE BUDDHA AND HIS DHAMMA' या ग्रंथाचा आधार तर घेतला आहेच, पण अगदी तिपिटकापासून आधुनिक काळातील विविध लेखकांच्या ग्रंथांपर्यंत त्यांनी असंख्य अभ्यासकांच्या लेखनाची चिकित्सक दखल घेतली आहे. त्यांच्यापैकी कुणाच्या भूमिकेचे समर्थन केले आहे, तर दुसऱ्या कुणाच्या विवेचनाचे खंडनही केले आहे. असे करताना स्वतःचा म्हणून एक डोळस दृष्टिकोण सदैव जागा ठेवला आहे. कोणाचीही मते डोळे झाकून स्वीकारू नका, या अर्थाचा उपदेश स्वतः बुद्धांनीही आयुष्यभर केला होता आणि बाबासाहेबांनी वारंवार तेच सांगितले होते. अशा पद्धतीने विचार करणारा मनुष्य खऱ्या अर्थाने स्वतंत्र असतो. डॉ. गायकवाड यांनी आपला ग्रंथ लिहिताना आपल्या विवेकाचे हे स्वातंत्र्य जपले आहे, ही महत्त्वाची बाब आहे.
त्यांनी या ग्रंथाचे लेखन करताना मराठीबरोबरच हिंदी, इंग्रजी आणि पाली या भाषांतील विविध ग्रंथांचेही संदर्भ घेतले आहेत. त्यांनी आपल्या या ग्रंथात मराठी साहित्यात प्रतिबिंबित झालेले बुद्धांचे चरित्र आणि तत्त्वज्ञान तर सुलभ व वाचनीय स्वरूपात मांडले आहेच, पण त्यांच्या या ग्रंथाची आणखी दोन वैशिष्ट्ये मी येथे आवर्जून नोंदवू इच्छितो. बुद्धांचे समतेचे विचार मान्य नसलेल्या वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्यावर काही हेत्वारोप केले आहेत. त्यांच्यापैकी काही आरोपांचे डॉ. गायकवाड यांनी समर्थपणे खंडन केले आहे. भावी काळात त्यांच्या हातून या विषयावर एखादा सर्वांगीण ग्रंथ मराठी साहित्याला अलंकृत करो, अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करू इच्छितो. त्यांच्या या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी इतर भाषांतून मराठीमध्ये अनुवादित झालेल्या बुद्धविषयक साहित्याची समीक्षा केली आहे, हेही त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे, असे मला वाटते.