'तथागत बुद्धांचा उपदेश आणि परिवर्तनवादी चळवळी' या विषयावर डॉ. आ. ह. साळुंखे यांनी तक्षशिला ज्ञान केंद्र, इस्लामपूर, जि. सांगली आणि विद्रोही साहित्य संमेलन, धुळे या दोन ठिकाणी आपले विचार व्यक्त केले होते. तथागतांचे विचार लोकांचे जीवन अधिक निकोप होण्यासाठी आणि परिवर्तनाच्या चळवळी यशस्वी होण्यासाठी कशा प्रकारे उपयोगी पडू शकतात, याविषयीची अभ्यासपूर्ण मांडणी त्यांनी आपल्या या व्याख्यानांमधून केली आहे. व्याख्यानांची भाषा बोलीच्या स्वरूपात होती. ती तशीच ठेवली आहे.
भारतीय समाजातील सर्व स्तरांतील लोकांच्या बुद्धिस्वातंत्र्याची चळवळ सुरू करून बुद्धांनी सामाजिक क्रांती केली. त्या क्रांतीचे यश बुद्धांची विचार पोचविण्याची शैली आणि माणसे जोडण्याची कला यांमध्ये होते. ज्यांच्यामध्ये परिवर्तन घडवून आणायचे, त्यांच्या स्वभावांचा आणि व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास बुद्धांनी केला होता. त्यांनी समाज बदलविण्यासाठी प्रशिक्षित भिक्खूंचे संघटन तयार केले आणि संघाच्या ऐक्यासाठी सातत्याने मार्गदर्शन केले. बुद्धांनी स्वतः उच्च विकास साधला आणि त्याबरोबरच आपल्या सहकाऱ्यांनाही उच्चतम विकासाकडे जाण्यासाठी मदत केली.