आपल्या स्वार्थाची एखादी गोष्ट बहुजनांच्या मनात खोलवर रुजावी अशी वैदिकांची इच्छा असली, की ते एक डाव टाकतात. ते ती गोष्ट बहुजनांमध्ये अत्यंत आदरणीय, मान्यताप्राप्त वा पूज्य असलेल्या एखाद्या व्यक्तीकडून करवून घेतात, निदान त्या व्यक्तीच्या तोंडून ती वदवून घेतात वा तिला तिची ओझरती का होईना मान्यता घेतात. ते जमले नाहीच, तर तिच्या मृत्यूनंतर ती गोष्ट चक्क तिच्या नावावर खपवून देण्यासाठी प्रचाराचा धूमधडाका सुरू करतात.
तुळशीच्या लग्नाचा विधी ही एक अशीच गोष्ट आहे. तुळस ही निःसंदिग्धपणे एका अनार्य, अवैदिक अशा पतिव्रता स्त्रीचे प्रतीक आहे. कोणा तरी आर्य पुरुषाने कपटाने तिचे शील भ्रष्ट केल्यामुळे तिने अग्नीत उडी घेऊन आत्महत्या केली. तिचा नवराही मारला गेला. आर्यांना मात्र तिचे शील भ्रष्ट करण्याचा क्षण हा आपल्या विजयाचा, आपल्या अभिमानाचा इतिहास आहे, असे वाटत होते. म्हणून त्यांनी तुळशीचा त्या पुरुषाबरोबरचा तो संबंध हा त्या दोघांचा विवाह म्हणून दरवर्षी साजरा करायला सुरुवात केली. तो विवाह बहुजनसमाजामध्ये रुजावा म्हणून या बलात्कारी पुरुषाचे आधी विष्णूशी आणि नंतर कृष्णाशी ऐक्य मानण्याची वैदिकांची चाल इतकी यशस्वी झाली, की त्या समाजाने आपल्याच एका महान स्त्रीच्या विटंबनेचा तो कलंकित क्षण हा पवित्र सण म्हणून स्वीकारला. तो समाज त्या अपवित्र क्षणाची जयंती अभिमानाने साजरी करू लागला.
आज आपण तुळशीला तिच्या आत्मबलिदानाबद्दल जरूर पूज्य मानले पाहिजे, पण तिचे लग्न विष्णूबरोबर वा कृष्णाबरोबर लावणे हा स्वतः तुळशीचा अपमान आहे. शिवाय, तो विष्णूचा, कृष्णाचा आणि एकूण समग्र बहुजनसमाजाचाही अपमान आहे, असे मला वाटते. प्रस्तुत पुस्तक म्हणजे या अपमानातून निर्माण झालेल्या दाहक व्यथेचा एक सौम्य आविष्कार आहे.