‘तुकारामांचा शेतकरी' हे पुस्तक आपल्या हाती देताना मला विशेष आनंद होत आहे. 'विद्रोही तुकाराम' या पुस्तकाच्या मनोगतात मी म्हटले होते त्यानुसार मला त्या पुस्तकात संत तुकारामांच्या अनेक उत्तम अभंगांना विस्तारभयास्तव स्पर्श करता आला नव्हता. त्यांचे शेतकऱ्यांच्या जीवनाविषयीचे अभंग अत्यंत महत्त्वाचे वाटत असूनही त्या पुस्तकात मी त्यांचा फक्त ओझरता निर्देशच करू शकलो होतो. 'विद्रोही तुकाराम' या पुस्तकाच्या अगोदर १ नोव्हेंबर १९९४ ते ३१ डिसेंबर १९९४ असे ६१ दिवस सातारा आकाशवाणी केंद्रावरून 'चिंतन' नावाच्या कार्यक्रमात तुकारामांच्या संबंधातील माझे काही विचार प्रक्षेपित करण्यात आले होते. त्या उपक्रमात मात्र मी तुकारामांच्या शेतीविषयीच्या बऱ्याच वचनांचे विवेचन केले होते. अर्थात, तेही पुरेसे नव्हतेच. स्वाभाविकच, या वचनांचा परामर्श एखाद्या छोट्याशा का होईना पुस्तकात स्वतंत्रपणे घ्यावा, असा विचार माझ्या मनात अनेक वर्षे घोळत होता.