छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक शत्रूशी संघर्ष करत करत स्वराज्याची स्थापना केली. प्रजेला गुलामगिरीतून मुक्त करण्याचे त्यांचे हे कार्य खचितच एका युगप्रवर्तनाचे होते. त्यांच्या हातून हे महान कार्य घडले, ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये असलेल्या अनेक सद्गुणांमुळे होय.
ते अत्यंत बुद्धिमान होते. शहाजी महाराजांनी त्यांना अनेक विद्या शिकविण्याची व्यवस्था केली होती. त्यांनी अनेक भाषा आणि लिपी आत्मसात केल्या होत्या. शहाजी महाराज आणि जिजामाता यांनी केलेले स्वराज्यस्थापनेचे आणि नैतिकतेचे संस्कार त्यांच्या मनात खोलवर रुजलेले होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात चारित्र्य आणि सामर्थ्य, शील आणि पराक्रम यांचा समन्वय झाला होता. त्यांच्याकडे नेतृत्व, व्यवस्थापन, दूरदर्शिता, द्रष्टेपणा, राजकीय शहाणपण, मुलकी आणि लष्करी प्रशासनाविषयीचे प्रभावी धोरण, सत्य आणि न्याय यांवरील निष्ठा, सर्वांना समान न्यायपूर्ण वागणूक देण्याची वृत्ती, भावी गोष्टींचा आराखडा तयार ठेवण्याचे नियोजन, नियोजित प्रकल्प तडीला नेण्याचे कौशल्य, संकटात खचून न जाता उफाळून येण्याचा निर्धार, सदैव जागृत राहण्याचा सावधपणा इ. प्रकारचे असंख्य गुण होते.
असे विविधगुणसंपन्न महाराज राज्याभिषेकाद्वारे स्वराज्याचे अधिकृत राजे बनले. परंतु त्यानंतर त्यांनी धार्मिक दृष्ट्या वेगळ्या प्रकारचा दुसरा एक राज्याभिषेकही करून घेतला. त्याच विषयावरील 'छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक' हे पुस्तक आपल्या हाती देताना मला आनंद होत आहे.