कवी देविदास महादेव सौदागर यांची कविता थेट वाचकांशी संवाद साधते. या मातीचा, या मातीतल्या इतिहासाचा ही कविता अभिमान बाळगते; तसेच आजच्या उद्विग्न करणाऱ्या वास्तवाने ही कविता व्याकूळही होते. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही सामान्यांच्या परिस्थितीत काहीच फरक पडू नये हे पाहून कविमन व्यथित होते. पण त्याचवेळी नव्या बदलासाठी उभे राहण्याचे ती आवाहनही करते. मानवतेचा झेंडा हातात घेऊन निघालेली ही कविता स्वातंत्र्य, समता, न्याय या मूल्यांसाठी आपलं काळीज जाळून घेते. अगदी निर्मळ आणि निर्भेळ असणारी ही कविता संवेदनशील मनाला अस्वस्थ करणारी आहे. आणि त्याचवेळी आश्वासित करणारीही आहे. कारण या कवितेत आणि कवीच्या मनात सतत एक बुद्ध वास्तव्य करून आहे. आणि म्हणूनच ही कविता वाचकांच्या मनात घर करणारी आहे.