चार्वाकांनी स्वानुभवनिष्ठा व प्रयोगशीलता यांना महत्त्व दिले आणि आज विज्ञानाचा प्रवास त्याच दिशेने चालू आहे. आज मानवाचा प्राचीन इतिहास समजण्यास उपयुक्त म्हणून वेदांना महत्त्व असले, तरी ज्ञानाचे प्रमाण आणि विशेषतः एकमेव वा सर्वश्रेष्ठ प्रमाण हे त्यांचे स्थान नष्ट झाले आहे. चार्वाकांनी यज्ञयागांवर पहिला हल्ला चढविला आणि ते यज्ञयाग आज जवळजवळ नामशेष झाले आहेत. चार्वाकांनी धर्मावर हल्ला चढविला आणि भारतीय घटना धर्मनिरपेक्षतेचा उद्घोष करताना दिसते. शिवाय, द्वेष व हिंसाचार यांना धर्मच प्रोत्साहन देत आहे, हे पाहून त्याला आवर घालण्याची गरज सर्व समंजस लोकांना वाटू लागली आहे. चार्वाकांनी चातुर्वर्त्यावर हल्ला चढविला आणि आज अशी स्थिती आहे, की चातुर्वर्ष्याचे दोष उघड झाले आहेत. चार्वाकांनी स्त्रीपुरुष समानतेचा, प्रयत्नवादाचा व भौतिक प्रगतीचा पुरस्कार केला. आज ही सगळी मूल्ये स्वीकारली जात आहेत. तात्पर्य, ज्या मूल्यांचा पुरस्कार केल्याबद्दल एके काळी चार्वाकांना अनीतिमान, पापी, समाजविरोधी ठरविण्यात आले होते, तीच मूल्ये आज मानवाच्या सर्वाधिक हिताची व कल्याणाची आहेत, असे मानले जात आहे. याचा अर्थच असा, की चार्वाकांचा पराभव नव्हे, तर विजय झाला आहे.